नाशिक :
समाजामध्ये वाढत चाललेल्या भोंदूगिरी व बुवाबाजीला आळा घालण्यासाठी कार्यकर्त्यांनी समाजात जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य अधिक व्यापक करावे, कारण आजच्या काळात ते अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत उत्तमराव कांबळे यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्यव्यापी परिषद ३ एप्रिल २०२६ रोजी नाशिक येथील सिटू भवन येथे तीन सत्रांच्या भरगच्च कार्यक्रमात पार पडली. नाशिकमध्ये अलीकडेच घडलेल्या भोंदूगिरीच्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिषद नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती. समाजासमोर खरे अध्यात्म आणि नैतिक मूल्य मांडण्याचा प्रयत्न या परिषदेत करण्यात आला. सध्या अध्यात्माच्या बुरख्याखाली वाढत चाललेल्या भोंदूगिरी व बुवाबाजीच्या प्रकारांना रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी ठाम निर्धार व्यक्त केला.
परिषदेत जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, या कायद्याची व्याप्ती वाढवावी तसेच तो देशपातळीवर लागू करावा, सर्व नेते व शासकीय पदाधिकाऱ्यांसाठी या कायद्याअंतर्गत आचारसंहिता लागू करावी आणि भोंदूगिरीविरोधातील विचार नव्या पिढीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत, असे महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वंदना शिंदे यांनी लोकगीते सादर करून झाली, तर प्रास्ताविक कृष्णा चांदवडे यांनी केले. महाराष्ट्रात विज्ञाननिष्ठा वाढविण्याचे आव्हान पुन्हा निर्माण झाले असून त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य नव्या उपाययोजनांसह अधिक प्रभावीपणे वाढवावे, असे मत मांडण्यात आले. उद्घाटक व प्रमुख पाहुणे कॉम्रेड कराड यांनी समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी विचारांमध्ये परिवर्तन आवश्यक असल्याचे सांगितले.
दुसऱ्या सत्रात डॉ. नितीन शिंदे यांनी तारे, ग्रह आणि नक्षत्र यांची शास्त्रीय माहिती सादर करत फलज्योतिष शास्त्र निराधार असल्याचे प्रतिपादन केले. तिसऱ्या सत्रात सहाय्यक पोलिस आयुक्त बाबासाहेब बुधवंत आणि ॲड. रंजना रवांदे यांनी बुवाबाजीविरोधातील कायदा व त्याची अंमलबजावणी यावर मार्गदर्शन केले.
या राज्य परिषदेला माधव बावगे, संजय बनसोडे, डॉ. ठकसेन गोराणे, माजी कुलगुरू डॉ. अशोक ढगे, भारतीय जनसंसदचे प्रदेशाध्यक्ष अशोक सब्बन यांच्यासह महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी नाशिक शहरात भव्य पदयात्रा काढून आणि विविध घोषणा देऊन परिषदेचा समारोप करण्यात आला.

