नेवासा, प्रतिनिधी :
पावसाळा लांबणीवर गेल्याने नेवासा तालुक्यात पाण्याची टंचाई तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे मुळा धरणाच्या पाण्याचे रोटेशन नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आले. परिणामी कडक उन्हाळ्याच्या परिस्थितीतही तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले असून हजारो एकरांवरील खरीप, ऊस व इतर पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुळा उजवा कालवा सिंचनाखाली नेवासा तालुक्यातील सुमारे ६० ते ७० टक्के क्षेत्र येते. या क्षेत्रातील अंतिम टोकावर असलेल्या वाकडी, शिरजगाव, सुकळी, वडुळे, सलाबतपूर, गोपाळपूर, खडका, जळके, तामसवाडी, सोनई, करजगाव, खरवंडी, उस्थळ दुमला, तरवडी, कुकाणा आणि चीलेखनवाडी या गावांपर्यंतही यंदा प्रभावीपणे सिंचनाचे पाणी पोहोचले. विशेष म्हणजे कालव्याच्या शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांनाही पाणी मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
यंदा पाण्याची उपलब्धता मर्यादित असतानाही आमदार लंघे यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे रोटेशनचा कालावधी वाढविण्याची मागणी सातत्याने लावून धरली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आवर्तनाचा कालावधी वाढविण्यात आला. त्यामुळे केवळ दूरवरच्या शेतांपर्यंत पाणी पोहोचले नाही, तर बंधारे, ओढे आणि नालेही भरल्याने शेतीला मोठा आधार मिळाला. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची वेळ टळल्याने शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.
पाण्याचे रोटेशन सुरू असताना केवळ आदेशावर न थांबता आमदार विठ्ठलराव लंघे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून संपूर्ण परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवले. कोणत्याही गावावर अन्याय होऊ नये, पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचावे आणि शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यालाही न्याय मिळावा, यासाठी त्यांनी प्रभावी समन्वय साधला. या यशस्वी पाठपाणी नियोजनामुळे नेवासा तालुक्यातील कृषी क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गातून आमदार विठ्ठलराव लंघे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
चौकट :
“शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविणे आणि त्यांच्या पिकांचे नुकसान टाळणे हेच आमचे उद्दिष्ट होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेत पाणी उपलब्ध करून देता आले.”
— आमदार विठ्ठलराव लंघे

