वाटप केले होते–तहसीलदार
नेवासा : विधानसभा निवडणुकीवेळी मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगाकडून पाठविण्यात आलेल्या मार्गदर्शिका मतदारांपर्यंत पोहोचविण्याऐवजी तहसील कार्यालयातच धूळ खात पडून राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आलेल्या या मार्गदर्शिकांचे पुढे काय झाले? त्या रद्दीत विकण्यात आल्या का? की नियमबाह्य पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावण्यात आली? याचा स्पष्ट खुलासा तहसील प्रशासनाने करावा, अशी मागणी swapnil गरड यांनी केली आहे
मतदारांना मतदानाची प्रक्रिया, मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध सुविधा, घरून मतदान तसेच टपाल मतपत्रिकेबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र या मार्गदर्शिका प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचल्याच नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे मतदार जागृतीसाठी आलेले साहित्य मतदारांपर्यंत पोहोचले नसेल, तर त्याचा उपयोग नेमका कशासाठी झाला? असा सवाल उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाने आयोगाकडून नेमक्या किती मार्गदर्शिका प्राप्त झाल्या, त्यापैकी किती मार्गदर्शिकांचे वाटप करण्यात आले आणि किती शिल्लक राहिल्या, याचा संपूर्ण हिशोब सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शिल्लक मार्गदर्शिकांची विल्हेवाट लावण्यात आली असल्यास ती कोणाच्या आदेशाने, कोणत्या शासकीय प्रक्रियेनुसार आणि त्याची नोंद कोणत्या अभिलेखात करण्यात आली, याचाही खुलासा करणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
रद्दीत विकल्या असतील तर रकमेचे काय?
जर शिल्लक मार्गदर्शिका रद्दीत विकण्यात आल्या असतील, तर त्यासाठी अधिकृत प्रक्रिया राबविण्यात आली होती का, विक्रीतून प्राप्त झालेली रक्कम शासनाच्या खात्यात जमा करण्यात आली का आणि त्यासंबंधी अधिकृत नोंद उपलब्ध आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीत विल्हेवाट किंवा विक्रीची प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून लागू शासकीय नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी तक्रारदार स्वप्निल गरड यांनी ई-मेलद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे.
तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून मार्गदर्शिकांच्या प्राप्तीपासून वितरणापर्यंत तसेच शिल्लक साहित्याच्या अंतिम विल्हेवाटीपर्यंतचा संपूर्ण हिशोब तपासावा आणि चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आह
चौकट—
मतदार संघातील मतदारांना जागृत करण्यासाठी आलेल्या मार्गदर्शन पुस्तिका मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी बी एल ओ तसेच इतर समाजसेवी व्यक्ती मार्फत वितरित केले होते व प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता—-तहसीलदार संजय बिरादर

