नेवासा (प्रतिनिधी) : नेवासा तालुक्यात किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मक्तापुर रोड परिसरातील आंबेडकर नगर, मुर्कीदपुर येथे ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आकाश साळवे व त्यांच्या कुटुंबीयांचा शेजाऱ्यांसोबत पूर्वीपासून किरकोळ वाद सुरू होता. १ मे रोजी सकाळी महिलांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर दुपारी पुन्हा वाद निर्माण झाला. संध्याकाळी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
मात्र रात्री सुमारे ९.१५ ते ९.४५ वाजण्याच्या दरम्यान वादाने अचानक हिंसक वळण घेतले. आरोपी पांढऱ्या स्विफ्ट कारमधून येत फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना जाणीवपूर्वक धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गाडीतून उतरून आरोपींनी कोयता, लाकडी दांडे, दगड तसेच मिरची पावडरचा वापर करत निर्घृण मारहाण केली.
या हल्ल्यात पप्पू उर्फ विशाल इंगळे, विकास साळवे व लता मिरपगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींवर कोयत्याने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी सात जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींनी संगनमताने जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

