अचूक माहिती हीच विकासाची पायाभरणी आहे,” असे सांगत प्रशासनाने नागरिकांना सहकार्याचे आवाहन…..
नेवासा – तालुक्यात राष्ट्रीय जनगणना मोहिमेची जोरदार तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आता अक्षरशः ‘जनगणना मोड’मध्ये आली आहे. प्रत्येक घरापर्यंत पोहोचून अचूक माहिती संकलित करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबवली जात आहे.
तहसीलदार डॉ. संजय बिरादार, अप्पर तहसीलदार श्रीमती सोनाली म्हात्रे तसेच तसेच निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे साहेब नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यापक मोहीम आकार घेत आहे.
तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाची नोंद व्हावी यासाठी तब्बल ६१९ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी १०५ पर्यवेक्षक सज्ज आहेत. सहा प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक अशी काटेकोर यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
२७ एप्रिलपासून प्रगणक व पर्यवेक्षकांचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण सुरू झाले असून तीन टप्प्यांत सखोल मार्गदर्शन दिले जात आहे. पहिल्याच टप्प्यात २५० प्रगणकांना प्रशिक्षण देऊन मोहिमेला वेग देण्यात आला आहे.
१ मे ते १५ मे या कालावधीत ‘स्वगणना’ टप्पा सुरू झाला असून नागरिकांनी स्वतःहून आपली माहिती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर १६ मेपासून प्रत्यक्ष घरभेटी देऊन जनगणना केली जाणार आहे. प्रत्येक प्रगणकाकडे सुमारे १८० ते २०० घरे किंवा ७०० ते ८०० लोकसंख्येची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
“अचूक माहिती हीच विकासाची पायाभरणी आहे,” असे सांगत प्रशासनाने नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी मुख्य जनगणना अधिकारी म्हणून काम पाहणार असून ग्रामीण भागात तहसीलदार आणि शहरी भागात मुख्याधिकारी हे चार्ज अधिकारी म्हणून मोहीम हाती घेणार आहेत.
नेवासा तालुका आता या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमासाठी सज्ज झाला असून, नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम यशस्वी होण्याची अपेक्षा तहसीलदार संजय बिरादार यांनी व्यक्त केली जात आहे.

