नेवासा प्रतिनिधी –
नेवासा तालुक्यातील बऱ्हानपूर येथील प्रगतशील शेतकरी विजयराव चव्हाण यांचे चिरंजीव डॉ. सौरभ विजय चव्हाण यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वैद्यकीय शिक्षणातील एमबीबीएस पदवी संपादन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मक्तापूर ग्रामस्थांसह मराठा सुकानू समिती व गणेशभाऊ झगरे मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
डॉ. सौरभ चव्हाण हे मक्तापूर येथील तुकाराम पाटील बर्डे यांचे नातू व लक्ष्मणराव पाटील बर्डे यांचे भाचे आहेत. अत्यंत गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमांच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवत नेट परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. त्यांच्या या यशामुळे बऱ्हानपूर व मक्तापूर परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
या निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा सुकानू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झगरे यांच्या हस्ते भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच तुकाराम पाटील बर्डे व लक्ष्मण पाटील बर्डे यांच्या निवासस्थानीही विशेष सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी गणेश भाऊ झगरे यांनी मनोगतात सांगितले, “सौरभसारखा युवक उच्च पदावर पोहोचल्याने मक्तापूर गावाची मान उंचावली आहे. त्याचा आदर्श प्रत्येक युवकाने घ्यावा. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते.” तर तुकाराम पाटील बर्डे यांनी भावना व्यक्त करत म्हटले, “सौरभने रात्रंदिवस कष्ट करून हे यश संपादन केले आहे. त्याचे वडील विजयराव यांनीही मोठे कष्ट घेत मुलाला या उंचीवर पोहोचवले. हे यश खऱ्या अर्थाने मेहनतीचे फळ आहे.”
या कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी तुकाराम पाटील बर्डे, बाळासाहेब देवराव बर्डे, मराठा सुकानू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झगरे, पोलीस पाटील अनिल लहारे, माऊली कृषी सेवा चे मालक शिवाजी दगडू बर्डे, कचरू भाऊ जामदार, संभाजी पोपटराव बर्डे, अमोल जामदार, गणेश कांगुणे, दत्तात्रय कोळेकर सर, सौरव कांगुणे, तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे, युवा नेते मनोज झगरे, मच्छिंद्र पांडागळे, आजिनाथ सुभाष बर्डे, प्रदीप बर्डे तसेच मक्तापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या जोरावर मोठे यश मिळवू शकते, हे सौरभ चव्हाण यांच्या यशातून पुन्हा अधोरेखित झाले असून त्यांच्या कर्तृत्वाने अनेक तरुणांना नवी दिशा मिळत आहे.

