नेवासा प्रतिनिधी
देशातील वाढती खाद्यतेल आयात ही अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब असून भारताने खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी दीर्घकालीन व शेतकरीकेंद्रित धोरण राबविण्याची गरज असल्याचे मत कृषी अभ्यासक डॉ. अशोकराव ढगे यांनी व्यक्त केले.
सध्या भारत मोठ्या प्रमाणात पाम ऑइलसह विविध खाद्यतेलांची आयात करीत असून त्यामुळे परकीय चलनाचा मोठा खर्च होत आहे. देशात हवामान, जमीन व पाण्याची उपलब्धता लक्षात घेतल्यास पाम लागवड मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकली असती. विशेषतः दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील काही भागांत पाम बागायतीस पोषक परिस्थिती असून नियोजनबद्ध पद्धतीने उद्योगविकास झाला असता तर देशांतर्गत पाम तेल उत्पादन वाढू शकले असते, असे त्यांनी सांगितले.
करडई, सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन यांसारख्या तेलबिया पिकांना हमीभाव, प्रक्रिया उद्योग, साठवण व्यवस्था आणि उत्पादनवाढीसाठी प्रोत्साहनपर योजना आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर, आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन सुविधा व बाजारपेठेची हमी मिळाल्यास खाद्यतेल उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील कृषी व औद्योगिक धोरणांमध्ये सातत्याचा अभाव राहिल्याने खाद्यतेल क्षेत्रात अपेक्षित प्रगती झाली नाही. पाम इंडस्ट्री, तेलबिया प्रक्रिया उद्योग आणि संशोधन यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक झाली असती तर आयातीवरील अवलंबित्व कमी झाले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
येत्या काळात जागतिक बाजारपेठेतील चढ-उतार, हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे खाद्यतेलाचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, संशोधक आणि धोरणकर्त्यांनी एकत्रितपणे विचारमंथन करून देशाला खाद्यतेल स्वयंपूर्णतेच्या दिशेने नेण्याची गरज असल्याचे डॉ. ढगे यांनी सांगितले.

