सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांचे या पालखीच्या मार्गावर सुविधांसाठी जिल्ह्यातील यंत्रणांना आदेश !
पालखी रथाची चांदी उजळवली
नेवासा (प्रतिनिधी) : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन स्मृतींना अभिवादन करणाऱ्या आणि वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाचे प्रतीक असलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळ्याच्या तयारीला अंतिम वेग आला असून, पालखी मार्गावरील मुक्कामस्थळे व दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणांची संबंधित शासकीय अधिकारी आणि पालखी सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला. अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना पालखी सुविधासाठी आदेश दिले आहेत
पाहणी दौऱ्यात जिल्हा प्रकल्प संचालक मंजुषा ठवकर, सहाय्यक अभियंता किरण साळवे, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच पंचायत समितीच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त कैलास जाधव, पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार ह.भ.प. गणेश महाराज आरगडे, सोहळा समितीचे ह.भ.प. हरी महाराज भोगे, संस्थानाचे जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे आणि प्रा. संकेत गवळी उपस्थित होते.
पालखी मार्गावरील विविध गावांमध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यासमवेत बैठका घेऊन वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचे नियोजन करण्यात आले. वॉटरप्रूफ मंडप, दुपारच्या विसाव्यासाठी प्रशस्त निवारा, महाप्रसाद व पंगत व्यवस्था, स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आरोग्य सेवा आणि स्वच्छता याबाबत प्रत्यक्ष स्थळांची पाहणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले. शासन, ग्रामपंचायती, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि पालखी सोहळा समिती यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे यंदाचाही पालखी सोहळा नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवा, समता, शिस्त आणि लोकसहभाग यांचे जिवंत प्रतीक आहे. या भावनेतून लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्याने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

