नेवासा(वार्ताहर) :
पहाटेपासून गावोगावी वृत्तपत्रे पोहोचविणाऱ्या वडिलांच्या कष्टाला आणि शेतात मोलमजुरी करणाऱ्या आईच्या संघर्षाला मुलीने शिक्षणाच्या बळावर यशाचे सुवर्णपंख लावले आहेत. नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील वृत्तपत्र विक्रेते अशोक पेहरकर व रंजना पेहरकर यांची कन्या अस्मिता अशोक पेहरकर हिने कायद्याची पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून गावातील तसेच माळी समाजातील पहिली महिला वकील होण्याचा मान मिळविला आहे.
साधी आर्थिक परिस्थिती, आई-वडिलांचे अथक कष्ट आणि शिक्षणाची जिद्द या बळावर अस्मिताने हे यश मिळविले आहे. माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथून तिने बी.ए. एलएल.बी.ची पाच वर्षांची पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण केली. या यशामुळे परिसरात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पेहरकर कुटुंबाने मुलगा-मुलगी असा कोणताही भेद न करता तिन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले. घरात वैद्यकीय किंवा कायद्याचे कोणतेही शैक्षणिक वातावरण नसतानाही दोन मुलींनी डॉक्टर होण्याचा मान मिळविला, तर अस्मिताने वकिली क्षेत्राची वाट निवडत कुटुंबाच्या संघर्षाला यशाची नवी दिशा दिली.
“कायद्याचे ज्ञान नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार,” असा निर्धार अस्मिताने व्यक्त केला. तिच्या यशामागे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अपर्णा कोतापल्ले, डॉ. शीतल बारहाते, डॉ. प्रतिभा गिरबाने आणि ॲड. संदीप मुंडे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे तिने सांगितले.
वृत्तपत्र विक्रेत्याच्या घरातून वकील घडल्याने भानसहिवरा परिसरात आनंदाचे वातावरण असून, अस्मिताची यशोगाथा ग्रामीण भागातील अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जिद्द, चिकाटी आणि आई-वडिलांच्या कष्टाचा सन्मान करणारे हे यश शिक्षणाच्या सामर्थ्याची जिवंत साक्ष ठरले आहे.

