शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीच्या निर्णया बद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
नेवासे, दि. १६ (प्रतिनिधी) – विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर-२०२६) मोहिमेमुळे मतदार यादी पारदर्शक, अद्ययावत आणि त्रुटीविरहित तयार होणार असून निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार दूर करण्यास मदत होईल. त्यामुळे हे काम देशहिताचे समजून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे राबवावे, तसेच कार्यकर्त्यांनीही त्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
नेवासे येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात गुरुवारी आयोजित विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर-२०२६) आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, शंकराव लोखंडे, भाऊसाहेब वाघ, ऋषिकेश शेटे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, गटविकास अधिकारी संजय लखवाल, प्रशिक्षणार्थी अधिकारी सोनल म्हात्रे, नायब तहसीलदार सुरेश गोसावी तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. विखे पाटील म्हणाले, एसआयआर-२०२६ मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी थेट नागरिकांच्या घरी जाऊन माहितीची पडताळणी करणार आहेत. त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत होईल. लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीची जाणीव ठेवून काळजीपूर्वक आणि काटेकोरपणे काम करावे, असे त्यांनी सांगितले.
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी पालकमंत्री विखे पाटील यांचे आभार मानताना त्यांच्या सहकार्यामुळे तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागत असल्याचे सांगितले. एसआयआर मोहिमेचा उल्लेख करताना त्यांनी काही ठिकाणी बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची नावे मतदार यादीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष दक्षता घेऊन पडताळणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
चौकट : कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत
राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीच्या निर्णयाचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होऊन नव्या उमेदीने शेती करू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

