सोनई कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कृषी जागरूकता व कृषीसंबंधी औद्योगिक कार्यानुभव उपक्रम
नेवासा,
: मूळा एज्युकेशन सोसायटीच्या सोनई येथील कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कृषी जागरूकता व कृषीसंबंधी औद्योगिक कार्यानुभव (RAWE) २०२६-२७ अंतर्गत चिलेखनवाडी येथे शेतकऱ्यांसाठी ऊस, कापूस व सोयाबीन पिकांच्या व्यवस्थापनावर मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले
.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनिल बोरुडे होते. त्यांनी ऊस पिकाची आधुनिक लागवड, सुधारित वाणांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, पाणी नियोजन, आंतरमशागत तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढ कशी साधता येईल, याविषयी मार्गदर्शन केले. परिसरातील ऊस उत्पादनाची सद्यस्थिती आणि अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वीकारलेल्या तंत्रज्ञानाचीही माहिती त्यांनी दिली.
कृषिशास्त्र विभागाचे प्रा. राहुल गडाख यांनी ऊसाच्या हंगामी लागवडीचे नियोजन, खत व पाणी व्यवस्थापन तसेच अन्नद्रव्यांच्या संतुलित वापरावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कीटकशास्त्र विभागाचे प्रा. नरेंद्र दहातोंडे यांनी ऊस व कापूस पिकांतील प्रमुख किडी व रोग, त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन आणि आर्थिक नुकसान पातळीचे महत्त्व स्पष्ट केले. ऊसावरील पांढरी अळी या किडीचे जीवनचक्र आणि शिफारशीनुसार कीटकनाशकांचा योग्य वापर करून प्रादुर्भाव कसा रोखता येतो, याची माहिती त्यांनी दिली.
वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रा. सचिन खाटीक यांनी जैवखतांचा योग्य वापर, त्यांचे फायदे तसेच सोयाबीन पिकातील प्रमुख रोग, त्यांची लक्षणे, प्रसाराची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. रोगमुक्त बियाणे, बीजप्रक्रिया आणि वेळेवर रोगनियंत्रण केल्यास नुकसान टाळता येते, असे त्यांनी सांगितले.
चर्चासत्रात शेतकऱ्यांनी उत्पादनवाढ, खत व्यवस्थापन, सिंचन, किडी व रोग नियंत्रण यासंदर्भातील विविध प्रश्न उपस्थित केले. तज्ज्ञांनी मृदा परीक्षणाच्या आधारे खतांचा वापर, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, वेळेवर आंतरमशागत, योग्य सिंचन आणि शिफारशीनुसार कीड-रोग नियंत्रण केल्यास उत्पादन व गुणवत्ता वाढते, असे सांगून शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनिल बोरुडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. अनुप दरंदले व कार्यक्रम अधिकारी प्रा. नरेंद्र दहातोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. आयोजन कृषीदूत महेश ढगे, भानुदास कारळे, प्रज्योत मोरे, दीप कोलते, मयूर कोलते आणि अथर्व होन यांनी केले. कार्यक्रमास चिलेखनवाडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

