अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक
नेवासा | तालुका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील वरखेड येथील महालक्ष्मी देवी यात्रेत दरवर्षी होणाऱ्या कथित ‘१२ गाड्या ओढण्याच्या’ जीवघेण्या प्रथेवर आणि उघड्यावर होणाऱ्या बेकायदेशीर पशुबळीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक भूमिका घेत थेट पोलीस प्रशासनाचे दार ठोठावले आहे. या प्रथा तात्काळ बंद करून आयोजकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची जोरदार मागणी समितीने केली आहे.
करोना दरम्यान काही काळ बंद पडलेली ही प्रथा पुन्हा एकदा मुंबईच्या एका सुशिक्षित महिलेने सुरू केल्याचे सांगण्यात येते
मध्यंतरी बंद असलेली ही प्रथा
अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली राज्य कार्यवाह कॉ. बाबा आरगडे, जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा, मीडिया जिल्हा कार्यवाह सुखदेव फुलारी, तालुकाध्यक्ष कॉ. आप्पासाहेब वाबळे, तालुका प्रधान सचिव भाऊसाहेब सावंत व विजय शिरसाठ यांच्या शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या यात्रेत ‘अंगात आल्याचा’ आव आणून १२ गाड्या ओढण्याचा अघोरी खेळ आयोजित केला जात असून, त्याचबरोबर कोणतीही अधिकृत परवानगी नसताना मोठ्या प्रमाणावर बोकडांचा बळी देण्यात येतो. या दोन्ही प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
अंनिसने यावेळी पूर्वी घडलेल्या दुर्घटनेचाही उल्लेख केला आहे. या प्रथेदरम्यान झालेल्या अपघातात लक्ष्मण घोडके आणि शंकर शिरसाठ यांचा मृत्यू, तर म्हसू घोडके यांच्यासह अन्य ग्रामस्थ गंभीर जखमी झाल्याची आठवण करून देत, ही परंपरा मानवी जीवाशी खेळणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, २५ मे २०२६ रोजी झालेल्या वरखेड ग्रामसभेनेही या प्रथा आणि गैरप्रकारांना विरोध करणारा ठराव मंजूर केल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. तसेच संबंधित कृत्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन अधिनियम, २०१३’ तसेच प्राणी संरक्षणाशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन असल्याचा दावा अंनिसने केला आहे.
यात्रेदरम्यान ‘१२ गाड्या ओढण्याचा’ खेळ आणि बेकायदेशीर पशुबळी पूर्णपणे रोखावेत, कोणतीही दुर्घटना झाल्यास मुख्य आयोजक कडूबाळ गोविंद गोरे, पोतराज अंकुश लाहुंडे व संबंधितांना जबाबदार धरून कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच यात्रेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणी अंनिसने पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

