“स्थितप्रज्ञ दर्शना”तून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर!…

नेवासा : ज्ञानेश्वरी लिखाणभूमी असलेल्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिरामध्ये अधिक मासानिमित्त रविवार, दि. १ जून ते ७ जून दरम्यान सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत संगीतमय “श्री ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा – स्थितप्रज्ञ दर्शन” या आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान विश्वस्त मंडळाने दिली.
हिंदू धर्मामध्ये अधिक मास हा भगवान विष्णूचा कर्मयोग, भक्ती आणि आत्मचिंतन शिकवणारा पवित्र कालखंड मानला जातो. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील ५४ व्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना “स्थितप्रज्ञ कोण?” असा प्रश्न विचारला आहे
त्यावर श्रीकृष्णांनी संत, महात्मा, ज्ञानी पुरुष यांचे स्वरूप स्पष्ट करणारे अमूल्य विचार मांडले आहेत. याच सहा श्लोकांचे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील शेवटच्या ८६ ओव्यांमधून अत्यंत सखोल आणि रसाळ विवेचन केलेले आहे.
या दिव्य विचारांवर सात दिवस संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के हे संगीतमय चिंतन व प्रवचन करणार आहेत. भक्तांनी या आध्यात्मिक ज्ञानसोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.
सध्या समाजामध्ये ज्ञानेश्वरी पारायणांची संख्या वाढत असली तरी ज्ञानेश्वरीचे चिंतन आणि आचरण मात्र कमी प्रमाणात दिसून येत आहे. कलियुगाच्या अंतिम टप्प्यात अनेक भोंदू साधू-संतांचा वावर वाढत असताना खरे संतत्व, ज्ञानी पुरुषांचे लक्षण आणि जीवनातील स्थैर्य याविषयी भगवान श्रीकृष्णांचे विचार व संत ज्ञानेश्वरांची शब्दसंपदा यांचा संगम या चिंतन सोहळ्यात अनुभवायला मिळणार आहे.
अधिक मासाच्या पावन पर्वात भक्ती, ज्ञान आणि आत्मजागृतीचा संदेश देणारा हा संगीतमय ज्ञानयज्ञ नेवासातील भाविकांसाठी मोठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे. तरी भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानेश्वर मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे

