नेवासा येथे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्यास भक्तिमय वातावरणात प्रारंभ
नेवासा (प्रतिनिधी) : मानवजातीचे पुण्य फळाला आल्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांनी जगाच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरीचा अमूल्य ठेवा दिला. या ग्रंथाचे श्रवण, मनन व चिंतन करून त्याचा अनुभव घ्यावा, असे प्रतिपादन वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री यांनी केले.
येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात अधिक मासानिमित्त देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीतमय ‘ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्या’चा प्रारंभ संत माऊलींच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाला. ज्ञानेश्वरी ही ब्रह्मविद्येची खान असून तिचे चिंतन केल्यास जीवनात विवेक प्राप्त होतो, असे त्यांनी सांगितले.
सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात, गहिनीनाथ महाराज आढाव, स्वामी ज्ञानेश्वरजी महाराज, अंजाबापू महाराज कर्डीले, हरि महाराज भोगे, मंगेश महाराज वाघ, राजेंद्र महाराज आसने, विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे, भिकाजी जंगले, रामभाऊ जगताप, कृष्णाभाऊ पिसोटे, कैलास जाधव, भैय्या कावरे व डॉ. संजय सुकाळकर आदी उपस्थित होते.
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील ‘स्थितप्रज्ञ’ विषयावरील अर्जुन-श्रीकृष्ण संवादाचे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत केलेले सखोल विवेचन या चिंतन सोहळ्यात उलगडण्यात येणार असल्याचे सांगून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
पहिल्या दिवशी पांडुरंग अभंग यांच्या हस्ते संतपूजन झाले. गायनाचार्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे, अंजाबापू कर्डीले, गहिनीनाथ महाराज आढाव, नवनाथ महाराज आगळे, कृष्णा महाराज कुलकर्णी व शंकर महाराज तनपुरे यांनी संगीत साथ दिली.
अधिक पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित हा चिंतन सोहळा दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत होत असून माऊली भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले. शेवगाव तालुक्यातील हिंगणगाव व देवटाकळी येथील ग्रामस्थांनी भाविकांना आमटी-भाकरी प्रसादाचे वाटप केले.

